Sunday, November 19, 2006

भारत यात्रा

आताच भारतातून परत आलो. वर्षानंतर भारतात जायला मिळतं तेव्हाचा आनंद काही औरच! फ़ोनवर कितीही गप्पा मारल्या तरीही घरच्या सगळ्यांना भेटून बोलण्यातला आनंद फ़ोनवर नाही मिळत! फ़ोन करुन मला तर अनेकदा हूरहूर लागते. उदास व्हायला होतं. वाटतं उगाच फ़ोन केला - चांगला रूळलो होतो - आता परत आठवण! हळुहळू सवय होउन जाते. मग आठवडाभर काम आणि वीकेंडला फ़ोन करायचं रूटिन अंगवळणी पडून जातं.

पण ह्या पोस्ट्चा विषय फ़ोन आणि आठवणी नाहीच!

दर वेळी भारतात जायचं म्हटलं की घरच्यांना भेटायची, मित्रांना भेटायची उत्सुकता असते. ह्या वेळी खूप जास्त उत्सुक होतो जायला तो वेगळ्याच कारणांसाठी.

पहिलं कारण म्हणजे - गेल्या वर्षात आमच्या घरात ऍड झालेली एक नवी मेंबर. माझी मुलगी - अनन्या. तिचा जन्म इथेच झाला. घरच्या सगळ्यांना इकडे येणं शक्य नव्हतं आणि तिला खूप लहानपणी न्यायची आमची इच्छा नव्हती. तान्ही बाळं खूपच नाजूक असतात आणि खूप demanding सुद्धा! तिला एवढ्या दूर न्यायचं तर तिचे हाल आणि तिच्या आईचेही! आता ती बर्यापैकी मोठी झालिये तर म्हटलं जाउन यावं. आजी, आजोबा, काका, मामा मंडळीना जरा खेळु देत. नाही तर चालायला लागेल, बोलायला लागेल आणि आपल्या घरातलं बाळ आपल्या नजरेआड इतकं मोठं होउन गेलं आणि आपल्याला तिचे लाड करायला मिळालेच नाहीत अशी त्यांना हूरहूर!

आणि ती चिमूरडीपण कुठे कमीये? तिला पण भरपूर माणसं लागतात! भारतात राहिलो महिनाभर तर सगळ्यांकडे जायला तयार - अगदी अनोळखी माणसांकडे सुद्धा! सगळ्यांना तोंडभरून smile देणार. बघणारा खूश. परत मॅडम त्यांच्याकडे झेप घेणार हसत हसत. समोरचा आधीच खुश झालेला, बाळ आपल्याकडे यायला मागतंय म्हटलं की त्यांना तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होउन जायचं! त्यामुळे माझी आणि शुभांगीची baby sitting duty वरून जवळ जवळ उचलबांगडीच झाली! अर्थात आम्हालाही तो एक welcome break होता म्हणा! पोरीचा कंटाळा अजिबात नाही आला पण दिवसभर एकट्याने बाळाला सांभाळणं आणि चार जणांनी थोडा हातभार लावणं ह्यात खूप फ़रक पडतो! एकट्या माणसाची मानपाठ एक होउन जाते. It's fun but very tiring. थोडा विसावा ममा-पपाला पण हवाच असतो! :-)

दूसरं कारण म्हणजे - गेल्या वर्षात आमच्या family त ऍड झालेलं नवं घर! :-)

लग्नानंतर मी आणि शुभांगीने सहा महिने जवळ जवळ प्रत्येक वीकेंड्ला आख्खं पुणं पालथं घातलं. एक कलमी कार्यक्रम - घर शोधणे! आम्ही दोघेही पुण्यात नवे. रस्ते माहित नसत. आपली ऍक्टिवा काढायची. एक कुठला तरी रस्ता पकडायचा. कूठे कूठे कंस्ट्रक्शन चालु आहे बघत निघायचं! एखाद्या ठिकाणी चांगला प्रोजेक्ट दिसला कि गाडी लावायची, साईट ऑफ़िस शोधायचं आणि सगळी माहिती काढायची. बिल्डर लोकांच्या a/c ऑफ़िसमध्ये बसुन brochure बघुन घरं सिलेक्ट करण्यापेक्षा स्वत: घर शोधुन अशी माहिती काढणं आम्हाला दोघांना आवडायचं! एक तर पुण्याची माहिती व्हायची. आम्हाला पुण्याची जेवढी माहिती असं फ़िरुन झाली तेवढी अन्यथा कधीच झाली नसती. परत बिल्डर लोकांची घर विकायची पद्धत काहीवेळा आम्हाला पटत नसे. Brochure मध्ये लिहिलेलं असणार की अमुक रोडवर साइट आहे. प्रत्यक्ष जाउन बघितलं की त्या रोडवरच्या कुठल्या तरी offroad वर अर्धा एक किलोमिटर आतमध्ये साइट. घर बघायच्या आतच आमचा मूड ऑफ़ झालेला असे. एवढ्या रणरणत्या उन्हात भर दूपारी असा पोपट झाला की आम्ही जाम वैतागायचो! एक तर ऊन. दुसरं म्हणजे बहुतेक construction चालु असलेले विभाग आमच्या घरापासुन १५ किमी दूर. इतक्या दूर जाउन असल्या कोपर्यातली घरं बघायचा अजिबात मूड नसायचा.

पण अश्या गोष्टीमधुन आम्ही बरंच काही शिकलो! एक तर बिल्डर लोकांना 'योग्य प्रश्न' विचारायचे. घरुन निघण्याआधीच विचारुन घ्यायचं मेन रोड पासुन साइट किती 'आत' आहे? त्याने सांगितलं २ मिनिटाच्या अंतरावर आहे कि समजायचं अर्धा किमी तरी आहे. त्याने सांगितलं की ५-१० मिनटांवर आहे तर सरळ Ditch. बिल्डर म्हणतो १० मिनिट म्हणजे त्याची साइट ऍड केलेल्या रोडवर जवळ्जवळ नसतेच! आणि साइट रोड्वर अगदी दर्शनी भागात असेल तर तुम्ही तिकडुन जाताना तुम्हाला ती दिसतेच!

आमचं रूटिन ठरलेलं असे. घरून निघताना ऍक्टिवाचा किमी काऊण्टर नोट करून घ्यायचो. आणि परत एखाद्या लॅण्ड्मार्कपासुन सुद्धा अंतर मोजायचा प्रयत्न करायचा. For example, पाषाणकडे घर बघायला जाताना युनिवर्सिटी सर्कल पासुन शक्यतो अंतर मोजायचं!

असेच एकदा बाणेर रोड वरुन आम्ही एक साइट शोधत जात होतो आणि आम्हाला अगदी रस्त्यावरच दूसरी एक साइट दिसली. त्यातली एक १० मजली इमारत जवळजवळ पुर्ण झाली होती आणि अजुन एक बिल्डिंग बनत होती....

मला माहित आहे की अभ्या, ऍश ही मंडळी मला शिव्या घालणार आहे म्हणुन पण... रात्रीचे अडीच वाजलेत आणि उद्या मला "पहाटे पहाटे" १० वाजता उठावं लागणार आहे. सध्या इथेही माझं घर संशोधन चालु आहे. त्याची १२ ला appointment आहे. आता झोपलंच पाहिजे! :-) बाकी नंतर...
(क्रमश:)

Sunday, November 05, 2006

सोनू निगमचा कभी अलविदा...

तुमको भीss है खबssर
मुझको भीss है पताss
हो रहाss है जुदाss
दोनों काss राsस्ताs

दूssssर जाssके भी मुझसे
तुsssम मेरीss यादों में रहना

कभी अलsविदा ना कहना...
कभी अलsविदा ना कहना...
कभी अलविदा ना कहना...

फ़ार वर्षांनंतर एखादे गाणं इतकं आतपर्यंत भिडलं असेल... शब्दांपेक्षाही सोनु निगममुळे! गेली कित्येक वर्षे सोनु निगमला ऐकतोय. रफ़ीच्या जवळपास जाणारा आजच्या काळातला एकमेव गायक. पण ह्या गाण्याने सोनु निगम अचानक ढांगा टाकत दोन चार जिने चढुन रफ़ीच्या अगदी शेजारी जाऊन पोचल्यासारखा वाटला. पहिल्या चार ओळी पहिल्यांदा सोनू गातो तेव्हा बॅकग्राऊंड्ला म्युज़िक जवळजवळ नाहीच! तरीही कुठेही बेसूर न होता, लय न चूकता आणि अतिशय भावगर्भ् आवाजात सोनुने ह्या ओळी गायल्यात. सूरेख!

अलका याग्निक ह्या गाण्यात त्याच्या पासंगालाही पुरली नाहीये! तिचा आवाज ऐकायला गोड वाटतो पण त्यात सोनूच्या गायकीतला 'गाणं आतुन आल्याचा' भाव जाणवत नाही. तिच्या ओळी कुठेही बेसुर नसुनही 'कोरडया' वाटतात. किंबहूना अलकाला 'भाव' न सापडल्यामुळे सोनु जास्तच 'भाव' खाऊन जातो!

करण जोहर, आदित्य चोप्रा आणि यश चोप्रा ह्या त्रिकूटाला बाकी काहीही दोष द्या पण ह्या लोकांनी हिंदी गाण्यातली जूनी 'मेलडी' टिकवुन ठेवण्यात गेल्या दोन दशकांत बरंच contribution दिलंय एवढं क्रेडिट ह्यांना द्यावंच लागेल!

बाय द वे, मामा, तु इजाज़त जसा स्वत:च्या बदलांसकट बनवायचं म्हणतो आहेस ना, तसा हा 'कभी अलविदा ना कहना' करणने यश चोप्राच्या सिलसिलावर बेतलाय आणि स्वत:च्या बदलांसकट सादर केलाय. पण त्याने तो इतका बदललाय की सहजासहजी ही गोष्ट ध्यानात येत नाही! What say?

बाकी पिक्चरमध्ये काहीही आवडो न आवडो पण त्यात करणने खूप मेहनत केलिये ही गोष्ट निर्विवाद.
छोट्या छोट्या गोष्टी - 'रॉक ऍण्ड रोल सोनिये' च्या शेवटी अमिताभची 'मायाs' हाक आणि नंतरचं छोटंसं लेक्चर. हो, ते फ़िल्मी आहे पण ते लेक्चरच कथानक पूढे घेउन जातं.

अभिषेक, राणी आणि अमिताभचं नातं...

अभिषेकचं राणीला शेवटी अमिताभचा एक सुंदर फोटो देणं...

किरोन खेरचं प्रिटीसोबत राहणं आणि प्रिटीचंदेखिल मोठ्या मनाने तिला सामावुन घेणं...

पिक्चरची एकूणच हाताळणी संवदेनशील आहे आणि त्याचा परिणाम होतोच. आणि म्हणुनच मला वाटतं की करन जोहर सारख्या ताकदीच्या दिग्दर्शकाने कथानक थोडं सांभाळुन निवडावं. कमिट्मेण्ट नसतानाही लग्नाच्या बेडीत अडकुन नंतर त्यातून सुटताही येतं असं विचित्र आणि धोकादायक चित्र ह्या पिक्चरमधुन उभं राहतं. मला वाटतं हे अतिशय चूकीचं आहे. मी स्वत: कॉलेजच्या दिवसांत पिक्चर पाहून किती influence व्हायचो हे आठवल्यावर तर मला जास्तच काळजी वाटते! एखादा तरूण किंवा तरूणी असा पिक्चर बघून ज़र लग्नाबाबत - No big deal, if it doesn't work out I'll look for someone else - असा समज करुन बसला/ली तर? विचार करून कांटा येतो अंगावर!

बोहल्यावर बसलेल्या नवरदेवाच्या आणि नवरीच्या मनांत काय चालू असतं आणि त्यांचं आयुष्य त्या एका दिवसाने किती प्रचंड बदलतं हे स्वत: त्यातुन न गेलेल्या करणला कोण आणि कसं समजवणार?
शादी का लड्डु खाके तो देखो करण बाबू - फ़िर एक और 'कभी अलविदा ना कहना' बनाना - it will be interesting to watch how your perspective changes!

But the bottomline is - Sonu Nigam has given one of his best performances in the title song! मज़ा आ गया सुनके!

Wednesday, November 01, 2006

रिमेकच्या जमान्यात माझे प्रतिनिधी!


आज मामाच्या ब्लॉगवरचा डॉनचा उल्लेख वाचुन रिमेक्स चा विषय डोक्यात घुसला.
जनता ज़र रिमेक्स बनवतेच आहे तर हे लोक इतका नतद्र्ष्ट्पणा का करताहेत हे मला समजत नाही!

अहो, ज़र तुम्हाला कुणी म्हणतंय की भूतकाळात जा आणि हवा तो क्रिकेटर बन तर हया लोकांची मजल रवि शास्त्री, रॉजर बिन्नी आणि ख्रिस ब्रॉडच्या पलिकडे जात नाहीये!

डॉन ब्रॅड्मन, गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय, क्लाईव लॉइड, रिचर्डस, गावस्कर, कपिल देव मेलेत का??

आय मीन खरोखर एखाद दोन टपकले असतीलही पण भूतकाळात जाल तेव्हा होतील की जिवंत!

ज़रा नजर ऊन्ची रख्खो ना यार!

रिमेक्सच करायचेत लोकांना तर हया लिस्ट वर विचार व्हावा -
१. आनंद: ओरिजिनल आनंदमधल्या आनंदच्या जागी आमिर खान आणि बाबु मोशायच्या भुमिकेत अभिषेक बच्चन . मुरारिलाल राजपाल यादव किंवा परेश रावल.

२. चुपके चुपके: धर्मेन्द्र - अक्षय, अमिताभ - अभिषेक, जया - राणी, शर्मिला - ऍश, ओमप्रकाश - परेश रावल.

३. दो बिघा ज़मीन: बलराज साहनी - आमिर खान

४. अर्धसत्य: (ओम पूरी ऎवजी कुणाला घेणार? अजय देवगण बहुतेक!)

५. तीसरी कसम: सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाणी जमायला हवीत. भूमिका: राज कपूर - गोविंदा, वहिदा रेहमान - ऍश.

६. विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अशोक सराफ़ आणि बच्चू आणि छकुली हे दोन बालकलाकार ह्यांचा एक सुन्दर मराठी पिक्चर आहे - आठवला - कळत नकळत!

भुमिका: विक्रम गोखले - संजय दत्त, सविता प्रभुणे - राणी, अशोक सराफ़ - अर्शद वारसी.

७. सरकारनामा

यशवंत देव - मोहन जोशी, त्याचा 'सत्कार' करणारा माणुस - चायना गेटचा विलन 'जगीरा', दिलिप प्रभावळ्कर - दिलिप प्रभावळ्कर, अजिंक्य देव - अभिषेक, खेडूत विलन - अजय देवगण.

८. ३६ घंटे!

९. तेरे घर के सामने (ओमप्रकाशच्या भुमिकेत परेश रावल ला घेउन + ए आर रहमान ला चॅलेंज करून की हिम्मत है तो ओरिजिनलसे मेलोडियस गानें बना के दिखा!)

१०. जाणता राजा (एक trilogy लागेल पण चालेल!) शिवाजी महाराज शोधावे लागतील!

मी सगळ्यांच्या कॉमेण्ट्सची वाट पाहतोय! :-)